महात्मा फुले

 👁️🌴👁️

*वाचावे आनंदे*

                यमाई औंध ,राजेंद्र गुरव


*महात्मा जोतीराव गोविंदराव फुले*

 

ज्योत लावली शिक्षणाची तिमिर मिटविला अज्ञानाचा रावा पासून रंका पर्यंत वसंत फुलवला ज्ञानाचा

 फुले म्हणुनी झाले थोर लेवुनि महात्म्याचे मोल

    ह्रदयी आमच्या नेहमी

      रहावे

       महात्मा फुल्यांचे बोल


म फुले म्हणजे क्रांतीसूर्य, द्रष्टा महात्मा आणि

वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले  समाजसुधारक लेखक, विचारवंत होत.

त्यांचा जन्मदिन - एप्रिल ११  इ.स. १८२७ होय

तर मृत्यूदिन नोव्हेंबर २८, इ.स. १८९० . 

महात्मा फुले  हे द्रष्टे व कर्ते बंडखोर समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.


 २३ सप्टे, १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. व्यवस्थेकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित अज्ञानी शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥'

 हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –


“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।  ”


हे नुसते न वदता प्रत्यक्ष कृतीत आणत.जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी कार्यरत झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला कर्मठांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’

मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सोमनाथ कन्नार म फुले यांचे बद्दल लिहतात -

'महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं. कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती.  पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगली असती. 


आज फुलेंच्या किंवा शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्यांची स्वतःची आई, बहीण, मुलगी फुलेंच्या त्यागाचा शिक्षणाद्वारे प्रत्यक्ष फायदा आणि स्वतंत्र उपभोगत आहेत. प्रत्येक समाजाची अन्यायी पुरोहितशाहीतून सुटका झाली आहे. तरीसुद्धा फुलेंच्या विचारांचं वावडं असणं ही केवळ विकृती आहे. कारण विकृतीला नेहमी विवेकाचं वावडं असतं. 


असिंहेचा अवाजवी हट्ट धरणाऱ्यांसाठी सांगायचं झालं तर फुलेंना उशीखाली दांडपट्टा बाळगण्याची गरज पडत होती. 

आणि दुर्दैव असं की अनेक बलीदानानंतर,हिंसक वृत्ती आणि विकृत बुद्धी समाताज कार्यरत रहात आहेत.

आजची भारतीय दंड संहिता आणि कायदा तेव्हाही होता. पण केवळ त्या आधारावर ती विकृती तेव्हाही थांबली नाही आणि अजूनही थांबू शकलेली नाही. त्यामुळं केवळ कायद्याच्या आधारावर विकृतीपासून स्वतःचं रक्षण करता येत नाही, हे पटत नसलं तरी कटू सत्य आहे. 


सामाजिक आणि बौद्धिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा फुलेंचंच बोट धरावं लागेल. त्यासाठी मग फुले मेंदू आणि मनगटासह स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. कारण विवेकवादी चळवळीला प्रत्येकवेळी एक विचारवंत गमावणं कदापी परवडणारं नाही.


म फुले हे काळाच्यापुढे गेले द्रष्टे विचारवंत होते. आजही सिंहावलोकन करता त्यांच्या कार्याचे महत्व लक्षात येते.

विचार निव्वळ परंपरेचे रुप घेऊन साचले की समाजमनाला म्लानता येते. तेव्हां समाजाला पुनः गती देण्यासाठी म फुले यांचेसारखे तेजस्वी महापुरुष कामी येतात.

🇮🇳🌸🌿☘🍀🍃🍂⭐🕉

राजेंद्र गुरव, यमाई औंध

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510